Monday, March 7, 2011

महिला दिन... दीन महिला...?

मार्च महिन्याच्या पूर्वसंध्येलाच बहुतेक महिला मंडळं... संघटनांना जागतिक महिला दिनाचे डोहाळे लागलेले असतात. गेल्या दहा वर्षांच्या इतिहास चाळला तर जागतिक महिला दिनमोठ्या उत्साहात साजरा केला गेल्याचे दाखले आपल्याला मिळतील. सासुरवाशीण ज्याप्रमाणे आखाजी सणाची आतुरतेने वाट पाहते, अगदी त्याचप्रमाणे महिला मंडळ तसेच गाव पातळीवरचे महिला बचत गटातील महिला या महिला दिनाची वाट पाहत असतात. महिला दिनाला आता मोठ्या उत्सवाचे स्वरूप आले आहे. परंतु, या महिलांना मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी ज्या लढल्या... झगडल्या त्याच भगिनींचाच या दिवशी विसर पडलेला दिसतो.

सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची कवाडं खुली केली. त्यांचे ऋण तर दूरच परंतु त्यांचे स्मरणही होताना दिसत नाही. महिलांच्या हक्कासाठी ज्यांनी संघर्ष केला, स्वतःचे जीवन खर्ची घातले, एवढेच नव्हे तर सरकार, समाज आणि पुरुषप्रधान संस्कृतीशी प्रचंड संघर्ष करून एका उज्ज्वल भविष्याने या महिलांची ओटी भरली. अशा थोर महिलांचे साधे नावही कोणाच्या ओठावर येत नाही.

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची ताकद ज्यांनी मिळवून दिली त्या महिलांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा हा दिवस! त्यांनी केलेल्या महान कार्यातून प्रेरणा घेण्याचा हा दिवस! या दिवशी समाजातील सगळ्या महिला संघटनांनी एकत्र येऊन समाज प्रवाहापासून दूर राहिलेल्या दीन महिलांना हात दिला पाहिजे. तळागाळातील महिलांचा विकास करण्याचा संकल्प या दिवशी केला पाहिजे.

महाराष्ट्रातील अतिदुर्गम भागात वास्तव्य करणार्‍या बहुतेक महिलांना मूलभूत अधिकार काय आहेत, हे माहीत नाही. तर त्या काय संघर्ष करणार? ‘जागतिक महिला दिनही काय भानगड आहे हेच त्यांना माहीत नाही. इतक्या त्या दीन आहेत. महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमावर्ती भागात असलेल्या सातपुड्याच्या डोंगरात राहणार्‍या आदिवासी महिला अतिशय मागासलेले जीवन जगत आहेत. या महिला शिक्षणच काय तर जवळपास सगळ्याच गोष्टींपासून वंचित राहिल्या आहेत. या महिलांनी कधी शाळेचे तोंड पाहिले नाही. पोटासाठी त्यांना दिवस- रात्र पायपीट करावी लागते. गरोदर महिलांना दवाखान्याअभावी प्रसूतीदरम्यान मरण यातना सहन कराव्या लागतात. प्रसूती दरम्यान मरण पावलेल्या आदिवासी महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. आता शासनाने आश्रमशाळा, प्राथमिक शाळा सुरू केल्या आहेत परंतु, पटावरील संख्याही बोटावर मोजण्या इतकीच असते. शिक्षणाअभावी येथील महिलांच्या जीवनातून अंधार अजूनही नाहीसा झालेला नाही. मानसिक व शारीरिक परिपक्व न झालेल्या वयातच आदिवासी समाजात मुलींचे लग्न लावून दिले जाते. येथील मुली वयाच्या १४-१५ वर्षांतच आई होतात. ज्या समाजातील महिलाच अज्ञानी असेल तर त्या समाजाचे काय होईल..?

सामाजिक संघटना, महिला मंडळे यांनी आपापसातील कार्यक्रमाची स्पर्धा थांबवून समाजातील ज्या महिला मागे राहिल्या आहेत, त्यांना मार्ग सुचत नसेल, अशा महिलांना योग्य दिशा देऊन प्रवाहात आणण्याची खरी गरज आहे.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला संघटनांनी एकत्र येऊन मागासलेल्या महिलांना प्रवाहात आणण्यासाठी अतिदुर्गम भागात जाऊन मार्गदर्शन शिबिर घेतले पाहिजे. त्यांना त्यांच्या मूलभूत अधिकारांची जाणीव करून दिली पाहिजे. महिलांसाठी शासनाने राखीव ठेवलेले हक्क, सुविधा याविषयी माहिती दिली पाहिजे. एवढेच नव्हे तर या महिलांच्या दीनतेवर अभ्यासपूर्ण संशोधन करून त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडल्या पाहिजेत, तरच जागतिक महिला दिनाचा उद्देश खर्‍या अर्थाने सार्थक ठरेल...