
पुणे, दि.३० : 'सेक्स' या शब्दाभोवती अनावर औत्सुक्य आणि सुखद संवेदनाचे एक विशिष्ट वलय निर्माण झाले आहे. परंतु, 'होमोसेक्शुअलिटी' किवा 'समलिंगी' हा शब्द जरी उच्चारला, तरी समोरील व्यक्तीच्या भुवया आकसल्या जातात. त्यांच्या तोंडात कडवट तार जमते, परंतु भाकरीच्या भुकेइतकीच शरीराची भूक हीसुद्धा माणसासह सर्वच प्राणांच्या जगण्याशी निगडित आहे. आणि त्याला तृतीयपंथीय तरी कसे अपवाद ठरणार? समाजाने त्यांना वाळीत टाकले आहे. समाज त्यांना वेगळे समजतो, त्यांना नेहमी डावलतो; परंतु एचआयव्हीसह जगणाऱ्या तृतीयपंथीयांचे काय? अशी खंत १ डिसेंबर, 'जागतिक एड्स दिनाच्या पूर्वसंध्येला 'आशीर्वाद इन्युचेस प्रोजेक्ट'च्या संचालिका बी. पन्ना गाबरेल यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली.
हावभाव, शारीरिक बदलाच्या स्वरूपामुळे 'तृतीयपंथी' असल्याचे ते लपवू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना कोणी काम देत नाही. आर्थिक साधनच नाही, तर सन्मान दूरची बाब आहे. पोटासाठी त्यांना दारोदार हिंडण्याची वेळ आली आहे. यातील कोणी नर्सिंग, कोणी डान्सर, कोणी इंटेरियर डिझायनर, तर कणी गायक असूनही केवळ तृतीयपंथीय असल्यामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली आहे. याउलट समाजातील विविध क्षेत्रांत वावरणाऱ्या व्यक्तींमध्ये असे अनेकजण आढळून येतात, की ते समलिगी लैंगिक संबंध (Homosexuals) ठेवत असतात. अशा समलिंगी असणाऱ्यांपैकी बहुतांश लोक तृतीयपंथीयांच्या संपर्कात येतात आणि आपली शारीरिक भूक भागवितात. अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्यांना एचआयव्ही होण्याचा धोका अधिक असतो.
१९८१ साली अमेरिकेत लॉस अॅन्जेलिस या ठिकाणी प्रथम 'एड्स'चे रोगी निदर्शनास आले. त्या वेळी नवीन रोगाचे कारण कळू शकले नाही. 'एड्स' हे नावही त्या वेळी ठेवले गेले नव्हते; पण हा रोग समलिंगी लैंगिकसंबंध (Homosexuals) ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये दिसून आला होता, याची मात्र नोंद घेतली गेली. अनैसर्गिक संबंध ठेवल्याने तृतीयपंथीयांना आरोग्याच्या गंभीर समस्या उदभवतात. संसर्गजन्य आजार, गुप्तरोगांची, एचआयव्ही, एड्स बाधा निष्पन्न होते. अशा तृतीयपंथीयांना वेळीच समुपदेशन आणि वैद्यकीय सल्ला, उपचार देण्याची गरज भासते, असे गाबरेल म्हणाल्या.
पुणे शहरात १० हजारांहून अधिक तृतीयपंथीय लोक आहेत. शहरातील बुधवार पेठ भागात २००९ मध्ये स्थापन झालेली 'आशीर्वाद' संस्था तृतीयपंथीय लोकांसाठी कार्यरत आहे. गेल्या एक वर्षात शहरातील शंभर तृतीयपंथीयांची तपासणी करण्यात आली असून, त्यांपैकी ६० जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ते २५ ते ६० वयोगटातील आहेत. या लोकांची संस्थेच्या माध्यमातून दर ६ महिन्यांतून तपासणी करणे, गुप्त रोगाविषयी माहिती देणे, अनैसर्गिक संबंध टाळण्यास सांगणे, अशा प्रकारचे मार्गदर्शन केले जाते. परंतु, आपल्याला एड्स झाला आहे, अशा भीतीखाली हे लोक वावरतात, त्यामुळे त्यांच्यावर काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. आशीर्वाद संस्थेने या लोकांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. तृतीयपंथीय हासुद्धा समाजाचा एक घटक असून, त्यांच्यात भेदभाव करू नये, त्यांना समाजाने स्वीकारावे, असेही त्या म्हणाल्या.
याशिवाय आशीर्वाद संस्था बुधवार पेठ भागातील सर्व वेश्या गल्लीतील महिलांसाठीही कार्य करते. महिलांची तपासणी करणे, कन्डोम वापरण्यास सांगणे, आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलांना एआरटी सेंटरकडून उपचार सुरू करणे, अशी कामे ही संस्था बिगर सरकारी संस्थेच्या (एनजीओ) सहकार्याने करते.
तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी, त्यांचे पुनर्वसन आणि सर्वांगीण विकास याच उद्देशाने आशीर्वाद संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. समाजाने दूर लोटलेल्या या उपेक्षितांना ही संस्था एक 'आशीर्वाद'च ठरली असून, विविध ठिकाणच्या तृतीयपंथीयांना एकत्तित करून एकसंधपणे माणुसकीच्या आणि सन्मानाच्या हक्काचा लढा देण्यास संस्था सज्ज झाली आहे.
No comments:
Post a Comment